नाशिक जळीत हत्याकांड ! तरुणाचा “व्हॅलेंटाईन डे” च्या दिवशीच मृत्यू

नाशिकच्या देवळ्यात प्रेयसीनं जाळलेल्या प्रियकराचा “व्हॅलेंटाईन डे” च्या दिवशीच मृत्यू झाला आहे. सारं काही कशासाठी तर प्रेमासाठी… लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीनं कुटुंबियांच्या मदतीने टोकाचा पाऊल उचललं.

देवळा तालुक्यातल्या लोहणेर गावात राहणाऱ्या गोरख बच्छाव या तरुणाचं मालेगावजवळच्या रावळगाव इथं राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघंही एकाच समाजातले आणि जवळचे नातेवाईक होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते, आणि त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता.

परंतु मुलीच्या कुटुंबियांच्या कानावर ही गोष्ट गेली, त्यांनी या लग्नाला विरोध केला आणि मुलीचं दुसरीकडे लग्न ठरवलं. या गोष्टीने दुखावलेल्या गोरख बच्छावने मुलीच्या होणाऱ्या नवऱ्या मुलाला प्रेमसंबंधांची माहिती दिली. आपले आणि मुलीचे प्रेमसंबंध असून तिच्याशी लग्न करायचं असल्याचं त्याने सांगितले. यानंतर होणाऱ्या नवऱ्या मुलाने लग्न मोडलं.

ही बाब मुलीच्या कुटुंबियांना जिव्हारी लागली, याचा बदला घेण्याच्या भावनेने मुलगी आणि तिचं कुटुंब पेटून उठलं. त्यांनी गोरख बच्छावला संपवण्याचा कट रचला. मुलीने फोन करुन गोरखला लोहणरे गावातील एका मंदिराजवळ भेटायला बोलावलं.

मुलगी आणि तिच्या घरचेही त्या ठिकाणी पोहचले. पण पोहचण्याआधी मुलीने दुकानातून रॉकेल विकत घेतलं. बोलवल्या प्रमाणे गोरख बच्छाव मंदिराजवळ आला असता मुलगी तिचे आई, वडील आणि दोन भावांनी मुलीचं लग्न का मोडलं असा जाब विचारत त्याच्यावर वार केले. त्याचवेळी संतापलेल्या मुलीने गोरखवर रॉकेल टाकलं आणि त्याला पेटवून दिलं. यात गोरखची प्रकृती गंभीर होती. त्याच्यावर नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला .

या प्रकरणी मुलीसह आई-वडील आणि दोन भाऊ यांना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *