‘अमृत महाआवास योजना’ या योजनेतून तुम्ही देखील घर घेऊ शकता ; अभियानाचा मुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ
मुंबई : सन २०२४ पर्यंत सर्वांसाठी घरे’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून आता ‘अमृत महाआवास योजना’ २०२२-२३ अभियानातील ५ लाख घरे पुढील १०० दिवसात बांधण्यात येणार आहेत.
विक्रमी वेळेत घरकुले बांधली जाणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान २०२२-२३ चा राज्यस्तरीय शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते,
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. सर्वांना घरे मिळावी यासाठी राज्यात विविध योजना राबविल्या जात आहेत, यासाठी सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.
राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दर्जेदार आणि वेळेत घरे देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात, तेव्हा राज्याचा विकास वेगाने होत असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले..