भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव !

मागील युती सरकारने महाबळेश्वर जवळील स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध असलेल्या भिलारला पुस्तकाचे गाव करून एक नवा प्रयोग केला. ही संकल्पना आता प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत हा अनोखा निर्णय घेण्यात आला, प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.ही संकल्पना भिलारच्या धर्तीवर ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेवर असेल. सातारा जिल्ह्यातील भिलारी हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे, याच पार्श्वभूमीवर हे संकल्पना राबवण्याचा हा निर्णय आहे.राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर हा स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल.
पुस्तकांचे गाव ही योजना विस्तारीत स्वरूपात सुरू करताना पहिल्या टप्प्यात सहा महसुली विभागात आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव सुरू करण्यात येणार आहे.पुस्तकाचे गाव हा उपक्रम सुरु करतांना पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र असलेले, वाड:मयीन चळवळ, साहित्यिक वैशिष्ट्य असलेले गाव, केंद्र, राज्य संरक्षित स्मारक, कृषी पर्यटनाचे केंद्र असलेले, पुस्तकाचा खप अधिक असलेले गाव निवडले जाईल.
यामध्ये संत गाडगेबाबा पारितोषिक प्राप्त गावे, आदर्श गाव, तंटामुक्त, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता यासारख्या शासनाच्या अभियानात योजनेत पात्र ठरलेली पुरस्कार प्राप्त केलेली गावेही निवडता येतील. गावातील लोकांचा सहभाग आणि इच्छाशक्ती ही लक्षात घेतली जाईल. यासाठी मराठी भाषा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेसाठी वार्षिक १९ कोटी ७९ लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *