केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नीतेश राणे यांना मालवणी पोलिसांनी बजावले समन्स

दोन वर्षांनंतर पुन्हा दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. निर्माण झालेला वाद केंद्रीय मंत्री भाजपा खा. नारायण राणे यांनी केलेल्या खळबळजनक विधानांमुळे निर्माण झालं आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

यावरून दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावले आहे.

दिशा सालीयानच्या मृत्यूनंतर नारायण राणे, आणि नितेश राणे यांनी दिशाच्या मृ्त्यूबाबत आरोप केले होते. त्यामुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याबाबत त्यांनी दोन वेळा मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. १९ फेब्रुवारीला खा. नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.

मालवणी पोलिसांनी नारायण राणेंना समन्स बजावले असून ४ मार्च रोजी ११ वाजता नारायण राणेंना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यासाठी हे समन्स बजावले आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांचा जबाब यावेळी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नितेश राणे यांना देखील पोलिसांनी पाचारण केलं असून ३ मार्च रोजी ११ वाजता नितेश राणे यांना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *