औरंगाबादेतील स्मार्ट सिटी बस आजपासून धावणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन महिन्यापासून बंद असलेली औरंगाबादेतील स्मार्ट सिटी बससेवा आजपासून २३ जानेवारीपासून वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू होणार आहे. कर्मचारी संपावर असले तरी आता बसच्या चालक व वाहकपदाची जबाबदारी ५६ माजी सैनिकांवर सोपवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५ मार्गांवर ११ बसेस दोन पाळीत धावतील.

शहरात स्मार्ट सिटी बस सुरुवातीपासून एसटी महामंडळाचे चालक व वाहक यांच्यामार्फत चालवण्यात येत होती. परंतु मागील दोन महिन्यापासून एसटीचे कर्मचारी संपावर असल्याने स्मार्ट सिटी बससेवाही बंद आहे . आता एसटीचे काही कर्मचारी कामावर रुजू होत असून काही मार्गावर एसटी बससेवाही सुरू झाली आहे. परंतु सिटी बससेवा मात्र सुरू हाेऊ शकली नव्हती. त्यामुळे शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. ती दूर करण्यासाठी मनपाचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून माजी सैनिकांच्या हाती ही सेवा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ वर्ष चालक पदाचा अनुभव असेल अश्या माजी सैनिकांना चालक पदाची जवाबदारी देण्यात आली आहे. ‘या निर्णयामुळे नागरिकांना देशसेवेचा गौरव प्राप्त असलेल्या अनुभवी सैनिकांचे अनुशासन व कार्यक्षमतेचा लाभ होईल. या सेवेचा विस्तार कसा होईल यावर काम सुरू आहे,’ असे पांडेय म्हणाले. मागील काही महिन्यांत शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर, उपव्यवस्थापक मुकुल देव आणि सिद्धार्थ बनसोड यांच्या देखरेखीखाली ५६ चालक आणि वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.

शहरातील या पाच मार्गांवर धावणार स्मार्ट सिटी बस
सिडको- टीव्ही सेंटर- रेल्वेस्टेशन
औरंगपुरा- मध्यवर्ती बसस्थानक- रांजणगाव
सिडको- रांजणगाव- घाणेगाव
सिडको- रांजणगाव- जोगेश्वरी
चिकलठाणा – सिडको, महावीर चौक, मोरे चौक- रांजणगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *