देवदर्शन करून परत येणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात ; पाच जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटकातील गाणगापूर येथून देवदर्शन करून अक्कलकोटच्या दिशेने परत येणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन मुले गंभीर जखमी झाली.

सर्व मृत आणि जखमी अहमदनगर येथील राहणारे आहेत. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अफझलपूर तालुक्यात बळुर्गीजवळ हा भीषण अपघात झाला.

अहमदनगर येथील काही भाविक कुटुंबीयांसह अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन करून, पुढे श्री दत्तात्रेयाचे स्थान असलेल्या गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथील देवदर्शन आटोपून समाधानी ते अक्कलकोटच्या दिशेने परत निघाले होते. तेव्हा वाटेत बळुर्गी गावाजवळ त्यांच्या कारचे (एमएच १६ बीएच ५३९२) टायर फुटले आणि चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कारमधील चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४), त्यांच्या पत्नी छाया वीर (वय ५०), त्यांच्या दोन्ही मुली कोमल बाबासाहेब वीर आणि राणी बाबासाहेब वीर तसेच हिरा बाडे अशी मृतांची नावे आहेत. तर, जखमींमध्ये चैताली दिनकर सूर्यवंशी (वय २४), सायली बाबासाहेब वीर (वय १३) आणि ममनी (वय ३) यांचा समावेश आहे.

तर, गंभीर जखमी झालेल्या तीन मुलांना कलबुर्गी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफझलपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *