एसटी संपात झालेल्या नुकसान भरपाई कर्मचाऱ्याकडून होईल.? यावर महामंडळाने स्पष्ट केलं मत

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. परंतु, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे आज माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे.

एसटी संपामुळे महामंडळाचे १६०० कोटी रूपयांचे नुकसान झाले. तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसूली नुकसान भरपाई कामगिरीवर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहिन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, संपामुळे सर्वसामन्य प्रवासी, ज्येष्ठ नागरीकांचे तसेच शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामगारांनी आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहनही चन्ने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *