पत्नीच्या चारित्र्यावर संशय ; पतीने डोक्यात पाटा घालून केला खून
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील बाजीपुरा भागात घडली. या प्रकरणी आरोपी पती शेख खलील याला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन पती शेख खलील याने पत्नीच्या डोक्यात मोठा दगडी पाटा घातला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. भाड्याने घेतलेले घर रिकामे करण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये वाद सुरु होता. अंजुम खलील शेख असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी शेख खलील शेख इस्माईल हा खाजगी बसवर ड्रायव्हर म्हणून काम करतो.
२००९ मध्ये शेख खलील आणि अंजुम यांचा विवाह झाला होता. त्यांना नऊ आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. मात्र, तो खलील पत्नीला सतत चारित्र्याच्या संशयावरुन शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्यामुळे सतत त्यांच्यात वाद व्हायचे.
खलीलचे हे दुसरे लग्न होते. त्यापूर्वी त्याने वैजापूर येथे एका महिलेशी लग्न करुन तिथेही घर थाठले होते. यावरुन या पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरु होते. याच वादातून खलीलने अंजुमच्या डोक्यात मोठा दगडी पाटा घातला आणि तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास करत आहे.