नवाब मालिकांच्या मंत्रिपदाचा कारभार आता ‘या’ मंत्र्यांकडे
मुंबई : १७ मार्च रोजी सिव्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्थाव देखील पाठविण्यात आला.
त्यानंतर आता यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवाब मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तर अल्पसंख्याक मंत्रीपदाचा कार्यभार काढून तो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, १७ मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिकांची सर्व खाती काढून घेण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,‘नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याची त्यांच्याकडे जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचे आम्ही ठरवले आहे.’ तसेच नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष असून ते सध्या उपलब्ध नसल्याने त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. तसेच पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासह करतील, असेही जयंत पाटील म्हणाले होते.